Wednesday, 22 August 2018

चिमण्या परत फिरतील का?

चिमण्या परत फिरतील का?

काही घटना , काही गोष्टी अगदी मनाला जाऊन भिडतात. काही गीते तर हमखास हृदयाला हेलावून टाकतात. याचाच प्रत्यय मला काल आला. ऑफिसमध्ये कामातून थोडी उसंत मिळाली असता मोबाईलवर सहज म्हणून आठवणीतील गाणी ऐकत होतो. त्यावेळी 'जिव्हाळा' चित्रपटातील गीतकार महाकवी ग.दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गानसम्राज्ञी लतादीदींनी गायलेलं ' या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या...' हे गीत ऐकलं. या गीतात गदिमा नी लिहिलेले शब्द आपल्या हृदयाचा ठाव घेतल्यावाचून रहात नाहीत. आपल्या लेकरांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या व्याकूळ आईचे हृदयस्पर्शी शब्द गदिमांनी लिहिले आहेत. या गीताच्या शेवटच्या ओळी ' या बाळांनो या रे लवकर, वाटा अंधारल्या' या ओळी मनातल्या मनात पुन्हा पुन्हा गुणगुणत टेबलावर आलेल्या बातम्या करू लागलो. मन भूतकाळात केव्हाच गेलं होतं. संध्याकाळी उशीर झाला म्हणून घरी धावत सुटलो असताना दारात उभी असलेली वाट पाहणारी आई दिसली, आणि पुन्हा पुन्हा "वाट अंधारल्या" या ओळी डोक्यात घोळू लागल्या.  या विचारात असतानाच लातूर जिल्ह्यातील एक बातमी नजरेसमोर आली. बातमी तशी हल्लीच्या रुटीनचीच होती. परंतु खरोखरच "वाटा अंधारल्या"ची जाणीव करून देणारी होती.
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धश्रमात चार वर्षांपूर्वी रहायला आलेल्या डॉ. अरुण गोधमगावकरांचे 18 ऑगस्ट रोजी निधन झाले. आता यात नवीन काय, असे आपणास वाटेल. डॉ. गोधमगावकर यांना मी व्यक्तिशः ओळखत नाही, की त्यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही. परंतु त्यांच्या निधनावेळची स्थिती वाचून मी अस्वस्थ झालो. ज्या चिमण्यांच्या पंखात या डॉक्टर दाम्पत्याने आशेचे बळ भरले होते ती पाखरे आज त्यांच्या घरट्यातून तर निघाली होतीच, परंतु आयुष्याच्या सांजवेळी आर्त हाका मारूनही ती घराकडे परतायला तयार नव्हती. शेवटी संस्था चालकांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडत डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. नायगाव तालुक्यातील गोधमगावचे रहिवासी असलेले डॉक्टर एक नामांकित बालरोगतज्ज्ञ होते. अत्यंत कठीण दिवस काढून त्यांनी शिक्षण घेतले होते. आपल्या वाटेल आलेल्या हाल अपेष्टा आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांनी स्वतः कष्ट उपसत मुलाला एम. डी. केले. तसेच मुलीला स्त्री रोगतज्ज्ञ केले. त्यानंतर त्यांनी सून आणि जावई ही डॉक्टरच बघून मुलामुलींचे लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले. डॉक्टर पती पत्नीला फार आनंद झाला. हळूहळू कुटुंब वाढू लागले. डॉक्टरांना नातवंड झाली,जो तो आपापल्या संसारात रमला. आता मात्र मुलामुलीला  आईवडिलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. अशाच एके दिवशी डॉक्टरांच्या पत्नीचे निधन झाले, हे समजूनही मुलगा मुलगी आईच्या अंत्यसंस्काराला आली नाहीत. डॉक्टरांना खूप वाईट वाटले.
  त्यानंतर डॉक्टरांनी सगरोली येथील सैनिक स्कुल मधील रुग्णालयामध्ये काही काळ सेवा केली. मात्र वयानुसार काम झेपेनासे झाल्यावर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धश्रमात आपला मुक्काम हलवला. तेथे चार वर्षे राहिल्यानंतर अखेर वृद्धापकाळाने त्यांचे 18 ऑगस्टला निधन झाले. नियमाप्रमाणे वृद्धश्रमाच्या संचालकांनी अमेरिकेतील मुलांना कळवले. मात्र आम्हाला सध्या यायला मिल नार नाही असे सांगून तुम्हीच अंत्यविधी आटोपून घ्या, असा निरोप दिला. डॉक्टर गेले, त्यांनी केलेली रुग्णसेवा तेवढी मागे राहिली.
    डॉक्टरांचा मृत्यू सर्वसामान्यांसारखाच होता. परंतु त्याने अनेक प्रश्नांना जन्म दिला होता. डॉक्टरांच्या मृत्यूने नव्हे, तर त्यांच्या मुलांच्या अशा वर्तनाने मी अस्वस्थ झालो. का वागली असतील ती मुले अशी? खरंच आई वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी ही त्यांच्याकडे वेळ नसेल का? पैसा मिळवण्यासाठी माणूस इतका प्रॅक्टिकल होतो? काय कमी केले असेल त्या आई वडिलांनी? आपण मुलांच्या पंखात बळ दिलं ते भरारी घेण्यासाठीच ना? मग याच पंखाच्या आधारे आकाशात उंच उंच जाताना या पिलांना घरट्या चा विसर का बरे पडला? असा प्रश्न त्या आईवडिलांच्या आत्म्याला पडला असेलच ना? मुलांनी आपल्या वृद्ध आलं वडिलांना का त्यागावं? त्यांच्या उतार वयात त्यांची काठी बनून रहावं हे त्याचं कर्तव्य नाही का? की सर्व जबाबदारी समाजावर सोपवून मोकळं व्हायचं? अशा अनेकविध प्रश्नांचं ओझं डोक्यावर घेऊनच ऑफिसच्या पायऱ्या उतरू लागलो.

- शशांक सिनकर

Monday, 5 February 2018

मठाची उठाठेव का तरी?

                                     संन्यासाकडून संसाराकडे व्हाया मोहमाया
        

                                   मठाची उठाठेव का तरी? 

 भाजपा नेते योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेऊन राजशकट हाकायला प्रभावीपणे सुरूवात केल्यानंतर देशभरातील अनेक संन्याशी, स्वामी, योगींना पुन्हा सत्तास्थानी येण्याची स्वप्ने पडू लागली. धर्मकारणात राहून राजकारण न करता प्रत्यक्ष राजकरणात उतरुन समाजकार्य करण्याचे वेध त्यांना लागले. संसाराचा त्याग करून संन्यासीधर्म स्विकारलेल्या या मंडळींचा प्रवास ‘‘संन्यासाकडून संसाराकडे ’’ व्हाया मोहमाया असा उलटा सुरू आहे. मग यांनी मठाची उठाठेव तरी का करावी? 


संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या  पार पाडल्यानंतर शांत समाधानाने सर्वसंग परित्याग करून संन्यास घेणे असा आपल्या संस्कृतीमध्ये दंडक आहे. आपल्या जीवनाची  ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास अशा चार आश्रमांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या काळात भौतिक सुखांमध्ये आपण एवढे गुरफटलो आहोत की, उतार वय झाले तरी वानप्रस्थाश्रमाची आपल्याला आठवण होत नाही. सुखाची कल्पनाच बदलल्यामुळे आपण कित्येकपटीने सुखी असूनही समोरच्याच्या सुखाशी स्पर्धा करताना आपण सतत दु:खी असल्याची भावना आपल्या मनाला सलत राहते. त्यामुळे भौतिक सुखांच्या जंजाळात माणूस एवढा पिचून जातो की, जीवनाच्या उतारवयात संन्यासाश्रम आहे याची जाणीवच उरत नाही. हे झाले सामान्य माणसांचे. पण ज्यांनी अशा संसारी सुखांचा त्याग करून संन्यास घेतला आहे, आता केवळ धर्मकारणच करायचे असा दृढनिश्चय करून आपापल्या मठांची स्थापना केली आहे अशा साधू, संन्यासी, योगींना पुन्हा राजकारणाचा पर्यायाने संसारात गुरफटण्याचा मोह होतो आहे हे उफराटे नाही काय?
भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेऊन राजकिय कारकीर्द पुन्हा सुरू केली. योगींच्या या राजकिय प्रगतीने प्रेरीत होऊन गुरूपुरा वज्रदेही मठाचे श्री राजशेखरनंद स्वामी, श्री गुरू बसवा महामनेचे श्री बसवानंद स्वामी तसेच श्री शिव शरण मदरा गुरू पीठाचे श्री मदरा चेन्नैया स्वामी यांनादेखील आपण राजकारणात यावे असे आता वाटू लागले आहे. त्यासाठी या साधू सज्जनांनी राजकिय पक्षांचे मार्ग धुंडाळण्यास आरंभ केला आहे. काहींना भाजप जवळचा वाटू लागला आहे तर काहींना काँग्रेसमध्ये आपले बस्तान बसेल असा विश्वास वाटू लागला आहे. त्यासाठी आपली तयारी असावी म्हणून काहींनी तर आपल्या धार्मिक भाषणांना धार कशी येईल याकडे लक्ष दिले आहे. तर काहींनी राजकारणात येण्यासाठी सामाजिक कार्यांना सुरूवात केली आहे.
राजस्थान, कर्नाटकसह चार राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या पार्श्व्भूमीवर समाजातील सर्वच स्तरावर लगबग सुरू झाली आहे. ही लगबग असायला कोणाचीच हरकत नाही. कारण निवडणूका येणं ही काही लोकांसाठी पर्वणी असते, तर काहींसाठी उदरनिर्वाहाचे साधन असते. आपण ते समजू शकतो. परंतु निवडणूकांच्या वातावरणाने धर्मकारणासारखे क्षेत्र प्रभावित होणे ही थोडी अचंबित करणारी गोष्ट आहे. हे सर्व यासाठीच सांगायचे की, निवडणूकांच्या वातावरणाने कर्नाटकातील सहा ते सात स्वामींनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पडद्यामागून राजकारणाची सुत्रे हलविण्यापेक्षा सक्रिय राजकारणात उतरून सामाजिक कार्यात झोकून  देण्याचा निर्णय या स्वामी तसेच महाराजांनी घेतला आहे. विशेष म्हणजे राजकारणात येऊ पाहणारया  या साधूंना आपल्याकडे खेचण्याचे काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यातील बहुतेक स्वामींना काँग्रेसऐवजी भाजपा हा चांगला पर्याय वाटत आहे. किमान चार स्वामींनी तरी आगामी निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यासोबत स्वामी आले नाहीत तर ते किमान भाजपसोबत जाऊ नयेत यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. 
गुजरात निवडणूकीपासून काँग्रेसनेही आपले ‘धर्मनिरपेक्षतेचे सोवळे’ खुंटीवर टांगत मंदिर आणि मठांच्या पायऱ्या  झिजवायला सुरूवात केली आहे. निवडणूकांच्या पार्श्व्भूमीवर प्रसिद्धीमाध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चेनुसार कर्नाटकातील मठाधिपती राजकारणात येण्यासाठी अधिर झाले आहेत. स्वामी बसवानंद यांना भाजपच्या तिकिटावर कलाघाटगी मतदार संघातून निवडणूक लढवायची आहे, तर गोरक्षणाचे काम करणारे श्री राजशेखरनंद स्वामी यांनीही निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. श्री मदरा चेन्नेया स्वामी यांनी मात्र ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. भाजप कर्नाटकचे अध्यक्ष बी.एस.येडूरप्पा यांनी मात्र चेन्नेया स्वामींना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही त्यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी पायघड्या घालायला सुरूवात केली आहे. अशा मठाधिपतींचे कर्नाटकात मोठे प्रस्थ असते. किंबहुना आपला मतदारांवर जास्त प्रभाव पडू शकतो असे त्यांना वाटत असते. 
शेवटी हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. कुणी काय करावे हे ज्याचे त्याने ठरवावे. तसा त्याला अधिकारही आहे. मात्र संसारातून मुक्ती घेऊन परमार्थाकडे धाव घेणाऱ्या  सज्जनांनी पुन्हा आपला मार्ग बदलून या मोहमायेत गुरफटावे याला काय म्हणावे? परमार्थाकडे वाटचाल करताना प्रपंच हा त्या मार्गातील धोंडा आहे असा पूर्वी समज होता. समर्थ रामदास स्वामींनी श्री दासबोधामध्ये मानवी जीवनाचा आणि परमार्थाचा समन्वय साधला तसेच प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही असे ठामपणे सांगितले. श्री दासबोधाच्या सुरूवातीलाच समर्थांनी दासबोधाचा विषय ‘भक्तिमार्ग’ आहे असे सांगितले. दासबोध हा जीवनग्रंथ आहे. त्यात प्रपंचातून परमार्थाकडे कसे जावे याचे सुंदर वर्णन आहे. समर्थ म्हणतात ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका ।।’ संन्यासाकडून संसाराकडे व्हाया मोहमाया प्रवास करणाऱ्या  या मंडळींनी दासबोधाचे हे सार अंगी बाणवायला हवे. अन्यथा मठाची उठाठेव करून काय उपयोग? 
                                                                                                                                  -शशांक सिनकर