पहाटेची डुलकी की वेगाची नशा?
भय इथले संपत नाही
मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे गुरुवारी पहाटे ट्रक आणि कार यांची धडक होऊन दहा माणसांचा जीव गेला तर त्याच वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत आराम बस उलटुन चौघांचा मृत्यू झाला. भल्या पहाटेच्या या घटनेने कोकणवासीयांची सकाळ काळवंडली. दोन चार कुटुंबे उध्वस्त झाली. पहाटेची ट्रकचालकला डुलकी आली की ट्रकचालकाला वेगाची नशा नडली? कारणे काहीही असोत पण अशा अपघातांमुळे या महामार्गावरील प्रवासाचे भय काही संपत नाही.
गुरुवारची सकाळ उजाडलीच ती मुळी मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताच्या बातमीने. रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरालगत गोरेगाव रेपोली येथे ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात होऊन दहा जणांनी आपला जीव गमावला होता. दुर्देव असे की हे सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील होते. याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराजवळील हळवल फाट्यानजीक आराम बस उलटून चार प्रवाश्यांचा मृत्यू झाला. एकाचवेळी चौदा जणांच्या मृत्यूने अवघी कोकणपट्टी सुन्न झाली. अपघात झाला, जे व्हायचे ते घडून गेले. पण यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न मागे निर्माण झाले.
कोकणाचा पर्यटनातून विकास व्हावा, मुंबई गोवा हे अंतर कापताना वेळेची बचत व्हावी या उद्देशाने हा मार्ग चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला. मात्र गेले कित्येक वर्षे हा मार्ग या ना त्या कारणाने रखडलेलाच आहे. याबाबत स्वतंत्र चर्चा होऊ शकते. पण या रखडलेल्या कामामुळेच अनेकदा भीषण अपघात झाले आहेत. आजही तिचा परिस्थिती कायम आहे. रस्त्याचे चालू असलेले सदोष काम, अधून मधून असलेले वळण रस्ते. दिशादर्शक फलकांची वानवा अश्या एक ना अनेक कारणांनी या महामार्गावर अनेकदा मोठे अपघात झाले आहेत. आजचा अपघातही असाच झाल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतल्यानंतर समोर जी बाब आली ती गंभीर आहे. खेतरी नामक हा ट्रक चालक रात्री उशिरा लोटे एमआयडीसीतून बाहेर पडला तो मुंबईच्या दिशेने निघाला. पहाटेच्या सुमारास तो माणगावजवळ आला असता तो जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर चुकीच्या बाजूने चालला होता. त्याला रस्ता दुभाजकच दिसला नाही. हे सर्वात गंभीर आहे. काम सुरु असल्याच्या पाट्या न लावणे किंवा वळण रस्ता असल्याचा फलक न लावणे या चुकांसाठी महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरायला नको का? गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्यापही संपलेले नाही. प्रवाशांना खाचखळगे, खड्डेमय रस्ते तसेच धुळीचा सामना करत प्रवास करावा लागतो. मुंबई नागपूर समृद्धी महामहामार्ग केवळ साडेचार वर्षांत पूर्ण होतो, मात्र बारा वर्षानंतरही या महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल हे सांगता येत नाही. कोकणवासीयांच्या दृष्टीने ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
या महामार्गाची डिसेंबर २०१० साली घोषणा करण्यात आली. मोदी सरकारने २०१४ सालात महामार्गाच्या कामाला सुरुवात केली खरी परंतु प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते. २०१८ मध्ये पहिली जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना उत्तर देण्यास बांधील असल्याने खऱ्या अर्थाने महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र तब्बल बारा वर्षानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. समृद्धी महामार्ग निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण व्हावा म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वारंवार बैठक घेतल्या. मात्र कोकणातील या महामार्गाला कोणीच राजकीय वाली नसल्यासारखी अवस्था झाली आहे.
सद्यस्थितीत या महामार्गाची कामातील प्रगती बघता पनवेल ते इंदापुरचे काम मे २०२१ पर्यंत ८८.८ टक्के पूर्ण झाले. उर्वरित काम करण्यासाठी कासू ते इंदापूर या टप्प्यासाठी करारनामा करण्यात आला आहे. पळस्पे ते कासू या टप्प्यासाठी नव्या कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्याला काम करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड ते झाराप हा ११८ किलोमीटरचा महामार्ग एप्रिल २०२२ मध्ये तयार झाला आहे. सध्या या मार्गावरून वाहनांची वेगाने ये जा सुरू आहे. त्याचप्रमाणे कशेडी ते परशुराम घाट टप्प्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र अजूनही अनेक कामे अपूर्णच आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या अश्या या रडकथेमुळेही त्यावरील अपघातांची मालिका सुरूच राहते की काय असे भय कोकणवासीयांच्या मनात घर करून बसलेय.
- शशांक सिनकर